एके दिवशी "चार थापडा सासूच्या" साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले.
लिखाण अगदी एडीट करून तयार होते. इमेलवर ते लिखाण पाठवून अगदी आनंदाने त्याने लॅपटाॅप बंद केला. इतक्या घाईत लिहून पूर्ण करण्यामागे त्याचा एक उद्देश होता. त्याला त्याच्या गावी जायचे होते. उद्याच निघायचे होते....
पण सकाळी सात वाजता उठल्यावर अनपेक्षितपणे सुप्रियाचा फोन आला...
"तू आज येणार आहेस स्टुडिओत?", सुप्रिया विचारू लागली.
"नाही सुप्रिया! मला जरा गावी जावं लागतंय. काम आहे!", त्याने सुप्रियाला गावी जाण्याबद्दल आधी सांगीतले नव्हते.
"राजेश, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे!", सुप्रिया गंभीर होत म्हणाली.
"महत्वाचा विषय? कोणता?"
"आपल्या दोघांच्या आयुष्याबद्दलचा!"
"सुप्रिया, तुला नेमकं काय म्हणायचं आहे?"
"जरा स्पष्टच सांगते..."
"थांब सुप्रिया! फोनवर नको!"
"मग कुठे?"
"केपलर्स कॅफे मध्ये भेट!"
"किती वाजता?"
"दहाला ये. तिथेच नाश्ता करू!"
केपलर्स कॅफे. एका कोपऱ्यातल्या टेबलावर दोन्ही बसले. दोघांनी व्हेज ग्रिल सँडविच मागवले.
सोबत कॅपुचिनो कॉफी.
"राजेश, मी सरळ सरळ मुद्द्यालाच हात घालते. आपण लग्न करायचं का?"
"सुप्रिया, खरं सांगू? मला या प्रश्नाचं उत्तर आत्ता सांगता येणार नाही"
"का सांगता येणार नाही राजेश?", सुप्रियाला राजेशच्या अशा या पावित्र्याचे आश्चर्य वाटले.
"मला अजून बरीच मजल गाठायची आहे. माझे क्षेत्र अस्थिर आहे. बेभरवशाचं आहे. इन्कम मध्ये सातत्य नाही. मुंबई सारख्या शहरात आपल्याला परवडणार नाही!"
YOU ARE READING
वलय (कादंबरी)
General Fictionफिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये वलय निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची खळबळजनक कथा. सत्य घटनांवर आधारित!